“आरटीई’ अंतर्गत चौथी विशेष फेरी : पालकांना एसएमएसद्वारे माहिती
पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठी चौथ्या विशेष फेरीसाठी काढण्यात आलेल्या लॉटरीद्वारे 6 हजार 972 जणांचा प्रवेश जाहीर झाला आहे.
चालू शैक्षणिक वर्षात “आरटीई’ प्रवेशासाठी एकूण तीन फेऱ्यांच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यानंतरही प्रवेशाच्या 39 हजार 899 जागा रिक्त राहिल्या. या वरील प्रवेशासाठी शिक्षण विभागाने मान्यता दिली. त्याप्रमाणे ही फेरी राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत 2,727 शाळांमधील 7,408 रिक्त जागांसाठी “एनआयसी’तील ऑनलाइन यंत्रणेद्वारे लॉटरी काढण्यात आली. यासाठी 1 लाख 40 हजार 401 पालकांचे अर्ज उपलब्ध झाले होते. लॉटरी लागलेल्या पालकांना “एसएमएस’ही पाठविण्यात येऊ लागले आहेत. “एसएमएस’ न आल्यास वेबसाइटवर जाऊन ऍप्लिकेशन डिटेलमध्ये अर्ज क्रमांक टाकल्यास लॉटरी लागली आहे,की नाही याची माहिती पालकांना मिळणार आहे. लॉटरी लागलेल्या पालकांना पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करुन शाळांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी 11 ते 21 सप्टेंबर या कालावधीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
पुण्यात सर्वाधिक जागा उपलब्ध
“आरटीई’च्या चौथ्या विशेष फेरी अंतर्गत सर्वाधिक प्रवेशाच्या जागा या पुणे जिल्ह्यात तर सर्वांत कमी जागा या पालघरमध्ये आहेत. यात अहमदनगर-273, अकोला-121, अमरावती-243, औरंगाबाद-537, भंडारा-95, बीड-234, बुलढाणा-208, चंद्रपूर-112, धुळे-79, गडचिरोली-67, गोंदिया-55, हिंगोली-159, जळगाव-213, जालना-181, कोल्हापूर-67, लातूर-160, मुंबई-302, नागपूर-565, नांदेड-258,नंदूरबार-54, नाशिक-422, उस्मानाबाद-178, पालघर-23, परभणी-115, पुणे-1050, रायगड-121, रत्नागिरी- 49, सांगली-89, सातारा-51, सिंधुदुर्ग 56, सोलापूर-99, ठाणे-380, वर्धा-90, वाशिम-88, यवतमाळ-178 याप्रमाणे जागा आहेत.