लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. राज्यातील जनतेने मोदी-योगी यांच्या ‘डबल इंजिन’ सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट कौल दिला आहे. ४०३ सदस्यसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत २५५ जागांसह भाजपला बहुमत मिळाले आहे. अशातच उत्तर प्रदेश निवडणुकांच्या तोंडावर योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडत समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या मतदारसंघात काय निकाल लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मौर्य यांनी कुशीनगर जिल्ह्यातील फाझिलपुर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना निवडणुकीमध्ये प्रभाव स्वीकारावा लागला आहे. मौर्य यांच्या कन्या संघमित्रा मौर्य या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत.
अशातच आता, वडील स्वामी प्रसाद मौर्य यांचा निवडणुकीतील पराभव व भाजपचा उत्तर प्रदेशातील विजय यावर भाजप खासदार व मौर्य यांच्या कन्या संघमित्रा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने बहुमत प्राप्त केल्याबाबत आनंद असल्याचं सांगितलं. या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताना त्या म्हणाल्या, ‘राज्यात भाजपचं सरकार बहुमताने सत्तेत येणार हे तर नक्की होत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा लाभ घराघरापर्यंत पोहचला असून जनतेने मोदींच्या विकासाला कौल दिला.’
वडिलांच्या पराभवावर म्हणाल्या…
विधानसभा निवडणुकांमध्ये वडील स्वामी प्रसाद मौर्य यांच्या पराभव झाल्याबाबत विचारले असता संघमित्रा मौर्य यांनी, याबाबत कोणतेही दुःख नसल्याचे सांगितले. राजक्रांमध्ये जय-पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. राजकारणात कोणीही अमरपट्टा घेऊन आलेले नाही. आज पराभव झाला असला तरी जनतेसाठी काम करीत राहिल्यास उद्याचा विजय आपलाच आहे. असं त्या म्हणाल्या. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचे उदाहरण देखील संघमित्रा यांनी दिले. ‘केशव प्रसाद मौर्य हे आमच्याच कुटुंबातील आहेत. ते मला मुलगी मानतात. त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.’ असं त्यांनी सांगितलं. आपण आज खासदार असलो तरी इथपर्यंत पोहचण्यासाठी आपल्यालाही दोन वेळा पराभव स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप सोडणार का?
संघमित्रा यांना वडिलांप्रमाणे भाजपसोडून समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी, ‘माझे वडील व्यक्तिगत स्वातंत्र्याला महत्व देतात. त्यांनी जेव्हा भाजप सोडून समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी आम्हाला आमचे राजकीय भवितव्य ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे वडील जरी समाजवादी पक्षात असले तरी मी भाजपमध्येच राहणार आहे.’ असे सांगितले.