पुणे – सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांच्या जाण्याने कायदा क्षेत्राचे तर मोठे नुकसान झाले आहेत. त्याबरोबरच सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. सरळ, नि:पक्षपाती, प्रखर मत मांडणारे, अभ्यासू, समाजाला अनुसरून लिखाण करणारे व्यक्तीमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहेत.
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या निधनाने सामाजिक सुधारणेच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे. देशाच्या राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य करणारे ज्येष्ठ विधीज्ञ, कृतीशील विचारवंत, सामाजिक सुधारणांना वाहून घेतलेलं पुरोगामी नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांनी देशाच्या न्यायदान प्रक्रियेतलं आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
पी. बी. सावंत यांच्या निधनाने विख्यात कायदेतज्ज्ञ आपल्यातून निघून गेले आहेत. त्यामुळे पुरोगामी विचारांच्या चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून सावंत यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले आहेत. सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यघटनेची मूल्ये आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते.
– नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस
पी.बी.सावंत यांचे व्यक्तीमत्त्व आदर्श होते. त्यांचा खासगी, सार्वजनिक जीवन आणि म्हणून नेहमीच आदर्श होते. त्यांची आणि माझी मैत्री 50 वर्षांची होती. असा माणूस पुन्हा होणार नाही. त्यांनी विविध प्रश्नांवर दिलेले निर्णय प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झालेली आहे.
– बी.जी. कोळसे पाटील, माजी न्यायमूर्ती
पी.बी.सावंत यांच्या निधनाने कायदा क्षेत्रातील दिशादर्शक आणि मार्गदर्शक व्यक्तीमत्त्व हरपले आहे. प्रेमळ, अत्यंत सरळ, निष्पक्षपाती, विश्वासू, कठोर न्यायाधीश असे ते होते. सर्वोच्च्च न्यायालयात असतानाही त्यांनी तत्त्वनिष्ठ न्यायाधीश म्हणून लौकिक मिळवला. तेथून निवृत्त झाल्यानंतरही अनेक मोठी प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत.
– ऍड. एस.के. जैन, ज्येष्ठ विधिज्ञ
पी.बी.सावंत हे खूपच मोठे व्यक्तीमत्त्व होते. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातून खूप कमी न्यायाधीश गेले, त्यापैकी ते एक होते. न्यायमूर्ती म्हणून मोठे कार्य होतेच. परंतु, समाजासाठीही त्यांनी मोठे कार्य केले आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्याने कायद्याच्या क्षेत्रात तर पोकळी निर्माण झालीच आहे.
– ऍड. हर्षद निंबाळकर, सदस्य तथा माजी अध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा
माहिती अधिकार कायद्याच्या निर्मितीत पी.बी.सावंत यांनी मोठे योगदान दिले आहे. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जागृत असणारे, सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे ते होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात आपल्या निर्णयाने वेगळा ठसा निर्माण केला होता. कायदा विश्वात महाराष्ट्राची शान वाढविणारे समाजवादी विचारसरणीचे समाजसुधारक होते. त्यांच्या जाण्याने कायदा क्षेत्र आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झालेली आहे.
– ऍड. बाळासाहेब खोपडे, माजी अतिरिक जिल्हा सरकारी वकील
समाज परिवर्तनाच्या लढ्यात पी. बी. सावंत यांनी मोठे योगदान दिले आहे. समाज परिवर्तनाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकांना कोणी विरोध केला, तर ते अगदी शांतपणे व्यक्त होत असत. विरोधकांची भूमिका समजावून घ्यायचे. सर्वसामान्यांची मानवी मूल्य वाढावीत, यासाठी त्यांनी नेहमी विद्रोह केला. त्यांच्या जाण्याने एक चांगला मार्गदर्शन गमावल्याचे दु:ख होत आहे. त्यांनी मला आयुष्यभर प्रत्येक क्षणी साथ दिली.
– डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
सध्या राष्ट्रवाद आणि लोकशाही असा वाद सुरू आहे. त्यात पी. बी. सावंत यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे होते. त्यामुळे अशी माणसे आपल्यात असणे आवश्यक होते. पुरोगामी महाराष्ट्र आणि त्यातील राजकारणात सावंत यांचे मोठे स्थान होते. विविध विषयांवर केलेल्या भाष्यामुळे अनेकांना त्यातून मार्गदर्शन मिळत आले. आपल्या भूमिकेला सावंत यांचा पाठिंबा असणे, म्हणजे तो मुद्दा कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे, असे समजले जात असत.
– डॉ. कुमार सप्तर्षी, महाराष्ट्र अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी