हल्लीच्या काळात दुर्मिळ झालेला प्रकार म्हणजे पत्र. अगदी पूर्वीच्या साहित्यात कमळाच्या पानावर पत्र लिहिली जायची असं वाचनात येतं. परंतु आपल्या जीवनात मात्र या पत्राने वेगळाच रंग भरलाय. रेल्वे इंजिनाचा शोध, पोस्ट ऑफिसची स्थापना. या सगळ्यामुळे खरं क्रांती झाली. ही पत्र पोस्ट कार्ड, आंतरदेशीय यावरून पाठवली जायची. घरात पत्र आलं की एक उत्साह यायचा. काय बातमी असेल याची उत्सुकता असायची.
पत्रात कुणाची विवाह निश्चिती, कुणाची तब्येत याविषयी कुटुंबात नवा जीव जन्माला आला तर त्याविषयी लिहिले जाई. ज्यादिवशी पत्र येई त्यादिवशी दिवसभर चर्चेचा विषय तोच असे. पत्राचे उत्तर देणं हे गृहिणीचं किंवा कुटुंब प्रमुखाचे काम असायचं. पत्राला उत्तर रात्री सगळे एकत्र असताना दिलं जायचं उगीच काही विसरायला नको. काही पत्रांची उत्तरं मोजून चार ओळीत लिहिली जायची तर काही ऐसपैस. लग्न होऊन परगावी गेलेल्या मुलीचे पहिलं पत्र म्हणजे तिची खुशाली कळेपर्यंत जीवात जीव नसतो. ती आपलं सासर, नवरा यांच्याविषयी खूप लिहिते. आईवडील ते परत परत वाचून समाधान मानतात. पण हळूहळू संसाराच्या रहाटगाडग्यात गुंतली की पत्राचा ओघ आटतो.
पूर्वी परदेशात जाणाऱ्यांची संख्या कमी असायची त्यामुळे पत्र आलं की त्यावरच्या तिकिटापासून उत्सुकता असायची. पत्र 2/3 पानांच परदेशातल्या वर्णनाचं असायचं अशी पत्र जपून ठेवली जायची. आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगी आशीर्वाद द्यायला पत्र लिहिले जायचे. पती-पत्नी कामानिमित्त लांब असले तर पत्र हा दुवा होता. संवादाचा तो एकमेव आधार असायचा. “माझ्या मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं’ असा खेळातूनही आजोळचा संदेश मिळतो. या सगळ्यात फार मोठ्या प्रमाणात बदल झाला तो मोबाइलमुळे. मोबाइल गाव, खेडी, वाड्या, वस्त्यांमध्ये जाऊन पोचला. कुठलाही निरोप झटपट पोचू लागला. घरातल्या स्त्रीची मात्र यात पंचाईत झाली. तिच्याकडे मोबाइल नसेल तर इतरांवर अवलंबून राहावे लागते. मोबाइलमुळे एखादा गुप्त मेसेज देता येऊ लागला. याशिवाय संगणकामुळेही पत्र पाठवता येऊ लागलं.
शालेय अभ्यासक्रमात “पत्र लिहिणे’ हा प्रकार आहे. शिक्षक तयारी करून घेतात. आता घरी क्वचित पत्र येतात. त्यात पहिली मजा राहिली नाही. ऑफिसमध्ये पत्र आलं की सगळ्यांच्या मनात धाकधूक असते नक्की कुणासाठी आलं असेल. साहेबांनी पत्र फोडून मजकूर सांगेपर्यंत चैन पडत नाही. माझ्यासाठी काही नसेल ना ही काळजी! आताच्या सायबरच्या जमान्यात मात्र हा सस्पेन्स राहिला नाही. कारण पासवर्ड शोधून सगळ्यांना सगळी पत्र वाचता येतात. आजकाल बॅंक पत्रव्यवहार करते. दोन वाक्यातील पत्र. प्रत्येक पत्र वेगळं. काही आशयघन तर काही रुक्ष. काही लेखकांच्या पत्रांची पुस्तके प्रसिद्ध झाली. ती खरचं वाचनीय आहेत. मुद्देसूद पत्र कसं लिहावं याचा आदर्श नमुनाच म्हणाना.
पत्राचा मायना काय असावा हे वर्षानुवर्षे ठरून गेले आहे. आपल्याही अंगवळणी पडले आहे, तसं नसेल तर चुकल्यासारखं वाटतं. घरातल्या मंडळींना यथायोग्य नमस्कार देणं अगत्याचे असते. इंग्लिश पत्रांची मात्र स्टाइलच वेगळी. काही इंग्लिश पत्र संग्रही ठेवावी इतकी उत्कृष्ट असतात. भावना व्यक्त करायची प्रत्येकाची पद्धत वेगळी. हातून झालेल्या एखाद्या चुकीविषयी प्रत्यक्ष बोलता येत नसेल तर पत्र हा भावना पोचवण्याचा छान मार्ग आहे. विवाहासाठी नकार देतानाही पत्रातून सौम्य शब्दात मांडता येते. शब्द आपल्या मदतीला धावून येतात. मानपत्र आपल्याकडे कर्तबगार व्यक्तींना दिलं जातं. तोही पत्राचा एक प्रकार म्हणायचा का, त्यातला मजकूर हा त्या व्यक्तीचे कार्यकर्तृत्व मांडणारा असतो. काही मानपत्र अत्यंत वाचनीय, नेमक्या शब्दात मांडलेली असतात. नोकरीतून विशेष कार्य करून निवृत्त झालेल्या व्यक्तीला मानपत्र मिळणं हा सुखद धक्का असतो. याचसाठी इतके दिवस काम केले. त्याचे सार्थक झालं असं वाटतं कारण चार लोकांत आपोआप मान वाढतो. पत्राचा इतर प्रकार कमी झाला तरी चालेल पण मानपत्र मात्र दिली
गेली पाहिजे.
डॉ. नीलम ताटके