भवानीनगर (वार्ताहर)- इंदापूर तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे सणसर (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांच्या पॉलीहाऊसचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत असताना अशा प्रकारचे आस्मानी संकट शेतकऱ्यांवर येत आहे.
सणसर येथील शेतकऱ्यांनी पॉलीहाऊस उभे करून त्यामध्ये रंगीत ढोबळी मिरचीच्या पिकासह विविध पिकांची लागवड केली आहे. परंतु अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पॉलीहाऊसच्या छतावरील संपूर्ण पेपर वाऱ्यामुळे फाटला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बाजरीचे पीक देखील पूर्णपणे जमिनीवरती झोपले आहे. इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी या आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पॉलीहाऊसचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. सध्याच्या काळात शेतकऱ्यांवर अनेक प्रकारचे संकटे येत असल्याने शेतकऱ्यांच्या हातामध्ये योग्य प्रकारे उत्पन्न मिळत नाही. अनेक वेळा गारपीट, वादळी वारा, अवकाळी पाऊस, पिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे पडणारे रोग, कडक उन्हाळा अशा अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे कायमस्वरूपी निर्माण होत आहेत.
सध्याच्या काळात निसर्गानेही शेतकऱ्यांना साथ देण्याचे सोडल्याने अजूनही शेतकरी कायमच आर्थिक अडचणीत जात आहे. नक्की शेतकऱ्यांपुढे कोणते पीक घ्यावे आणि कोणत्या पिकांमधून आर्थिक उत्पन्न मिळेल, हाच प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु या होणाऱ्या आर्थिक नुकसानीतून थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिली तरच हे शेतकरी पुढील काळात शेती करू शकतील.
– विकास निंबाळकर, शेतकरी, मंचर