सिडनी –भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत विजयी सुरुवात न करून दिल्यास कसोटी मालिकेत भारताला 4-0ने मालिका पराभवाची नामुष्की पत्करावी लागू शकते, असे मत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्क याने व्यक्त केले आहे.
मायकल क्लार्क म्हणाला, ऑस्ट्रेलिया दौरावर असलेल्या भारतीय संघाला एकदिवसीय आणि टी 20 मालिकेपासूनच विजयी लय प्राप्त करायली हवी. कर्णधार विराट कोहलीने आपल्या नेतृत्वात एकदिवसीय आणि टी 20 मालिकेतील सामन्यात विजय मिळवून द्यावा. असे न झाल्यास भारतीय संघ दबावात येईल. या दबावाचा परिणाम कसोटी मालिकेदरम्यान दिसेल.
विराटला स्वतःवर जबाबदारी घेऊन संघाला एक चांगली सुरुवात करून द्यावी लागणार आहे. विराट संघाला कशी सुरुवात करून देतो याचा परिणाम तो पहिली कसोटी खेळून भारतात परतेल तेव्हा दिसणार आहे. विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. त्यामुळे भारताला विराटच्या अनुपस्थितीत 3 कसोटी सामन्यात अडचणीत येईल. त्यामुळे भारतीय संघास एकदिवसीय आणि टी 20 मालिकेपासून विजयी लय पकडायला हवी.
जर हा विजयी सूर गवसला नाही, तर कसोटी मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये भारत पराभूत होईल, असेही क्लार्क म्हणाला.