मंचर -आंबेगाव तालुक्यातील पारगाव पेठ भागात गणपती मंदीर परिसरात बुधवारी (दि. 1) सायंकाळच्या सुमारास तुफान झालेल्या पावसाने खरीप हंगामातील लागवड केलेल्या सुमारे 50 एकर क्षेत्रातील बटाट्याच्या बियाण्याचे नुकसान झाले आहे. लागवड केलेले बटाटे बियाणे जोरदार पावसामुळे वाहून गेले आहे. दुबार बटाटा बियाणे लावण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सातगाव पठार परिसरात खरीप हंगामातील बटाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मागील तीन ते चार दिवसांपासून सातगाव पठार परिसरात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बटाटा लागवड सुरू केली आहे. ही लागवड सुरू असतानाच बुधवारी पारगाव गावातील गावठाणाच्या पूर्वेकडील गणेशनगर परिसरात जोरदार स्वरूपाचा ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस झाला.
तासभर जोरात पडलेल्या या पावसाने लागवड केलेले बटाटे बियाणे अक्षरशः वाहून नेले आहे. अनेक शेतांचे बांध फुटले आहेत. मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खते, रासायनिक खते घालून 36 रुपये किलो दराने खरेदी केलेले टाटा बटाटा बियाणे शेतकऱ्यांनी जमिनीत लागवड केली होते; परंतु या पावसामुळे अक्षरशः हे बियाणे व खते वाहून गेली.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ढगफुटीसारखा झालेल्या पावसामुळे एकरी 60 ते 70 हजार रुपयांची आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसानीचे सरकारच्या वतीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब सावंत पाटील यांनी केली आहे.