नवी दिल्ली – ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शानदार कामगिरी करून विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला हेडिंग्लेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने 76 धावा आणि एका डावाने भारतावर विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
भारताचा पहिल्या डाव 78 धावांत गारद झाला होता. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्याने भारताला धावांचे शतकही करता आले नाही. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडसमोर भारतीय गोलंदाजही निष्प्रभ ठरले. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 432 धावा केल्या.
दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारताच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. लोकेश राहुल दुसऱ्या डावातही अपयश ठरला. त्याला 8 धावा करता आल्या. त्यानंतर रोहित शर्मा (59) आणि चेतेश्वर पुजारा (91) यांनी डाव सावरत आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र चौथ्या दिवशी पुजारा आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताचा दुसरा डाव 278 धावांत संपुष्टात आला.
इंग्लंडकडून दुसऱ्या डावात ऑली रॉबिनसनने पाच विकेट घेतल्या. क्रेग ओव्हरटनने दोन गडी बाद केले.