नाशिक – प्रभु श्रीराम हे कोणाच्याही सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला. नाशिकच्या सिडको परिसरात स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करताना आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाची पूजा केली.
करोनामुक्त महाराष्ट्र घडो, हीच श्रीराम चरणी प्रार्थना, अशी मनोकामना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. ‘प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक भूमीचाच मी सुपुत्र, माझा जन्म नाशिकचा. लहानपणापासून काळाराम मंदिर माझ्या तोंडपाठ, असे आव्हाड म्हणाले.
श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळं आणि भक्ती करणं वेगळं. ज्याच्या मनात प्रामाणिकपणा, मर्यादा आहे, त्याच्यामध्ये राम आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम असे आपण म्हणतो. त्यामुळे हे भूमिपूजन करत आहेत, त्याचं एवढं काही नाही. त्यांना वाटतंय ते करत आहेत, असेही त्यांनी स्प्ष्ट केले.
गेली 40 वर्षे भाजपने रामाच्या नावावर राजकारण केले आहे हे अख्ख्या जगाला माहिती आहे. रामाचे नाव घेऊन त्यांनी पाणी विकले, विटा विकल्या, सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केले आहे, असा घणाघातही आव्हाडांनी केला.