मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर भाजपाकडून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपा आक्रमक झाली असून किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला होता. यानंतर अन्वय नाईक कुटुंबीयांनी यासंबंधी खुलासा केला होता. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
नाईक कुटुंबाला इतकी मिरची लागली की आरोप झालेत ठाकरे कुटुंबावर आणि उत्तर देतायत नाईक कुटुंब. मोठा ज्होल ज्हाल दिसतोय… फारच जवळचे संबंध दिसतायत.
ठाकरे कुटुंबासोबत केलेल्या जमीन व्यवहारावर अन्वय नाईक कुटुंबीयांनी केला खुलासा; म्हणाले…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 13, 2020
“नाईक कुटुंबाला इतकी मिरची लागली की आरोप झालेत ठाकरे कुटुंबावर आणि उत्तर देतायत नाईक कुटुंब. मोठा झोलझाल दिसतोय. फारच जवळचे संबंध दिसतायत,” असे म्हणत निलेश राणे यांनी ठाकरे आणि नाईक कुटुंबीयांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली.
किरीट सोमय्या दावा करत असलेले जमिनीचे व्यवहार झाले असल्याची माहिती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी दिली होती. “मला बऱ्याच लोकांकडून कळले असून व्हिडीओदेखील पाहिला आहे. पण याच्यात गुपीत असे काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती दिली. किरीट सोमय्या जे सातबारे दाखवत आहेत ती खुली कागदपत्रे असतात. महाभूमीच्या वेबसाईटवर गेलात तरी तुम्हाला ती मिळतील. त्यामुळे ही अशी खुली कागदपत्रं जाहीर केल्याबद्दल मी किरीट सोमय्यांचे आभार मानते,” असा टोला आज्ञा नाईक यांनी लगावला होता.