नवी दिल्ली – संसदेत कोणत्याही चर्चेविनाच कृषी कायदे मागे घेतले गेले, यावर सरकारला टोमणा मारताना ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी डिबेटलेस पार्लमेंट दीर्घायु होवो अशी प्रतिक्रीया नोंदवली आहे.
त्यांनी म्हटले आहे की अधिवेशनाच्या सुरवातील पंतप्रधानांनी कोणत्याही विषयावरील चर्चेला सरकार तयार असल्याची तोंडभर ग्वाही दिली होती. आणि त्याच दिवशी सरकारने संसदेत कृषी कायद्यांवरील चर्चा टाळली आणि कोणत्याही चर्चेविना ही कृषी विधेयके रद्द करण्याचा प्रस्ताव संमत केला.
या निर्णयावर कृषी मंत्र्यांनी दिलेले कारण अफलातून होते, त्यांनी म्हटले आहे की सरकार आणि विरोधक दोघेही जर कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर सहमत असतील तर त्यावर चर्चा करण्याची गरजच काय? काहीही कारणे देऊन चर्चा टाळण्याच्या सरकारच्या या कृतीमुळे संसदेचे स्वरूप आता डिबेटलेस पार्लमेंट असे झाले असून या डिबेटलेस पार्लमेंटला दीर्घायु लाभो अशी प्रतिक्रीया चिदंबरम यांनी नोंदवली आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही काल सरकारच्या या भूमिकेवर टीका करताना चर्चेतून पळ काढणारे हे डरपोक सरकार आहे असे म्हटले होते.