पुणे – पुणे-मुंबई, पुणे-लोणावळादरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना बुधवारी दिलासा मिळाला. कारण पुणे-मुंबईदरम्यान एक्स्प्रेस, मेल सेवा पूर्ववत सुरू होणार असून लोणावळा लोकलही तातडीने सुरू करा, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. अनलॉकचा पुढील टप्पा 1 ऑक्टोबरपासून सुरू होत असून राज्यांतर्गत रेल्वे प्रवासास मुभा देण्यात आली आहे. परिणामी पुण्यातून मुंबईसह राज्याच्या अन्यही भागात रेल्वे सेवा सुरू होणार असून ठिकठिकाणी अडकून पडलेल्यांचीही सोय होणार आहे.
करोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्यांतर्गत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. एकीकडे एसटी सेवा 22 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली असली तरीदेखील राज्यांतर्गत रेल्वे सेवा मात्र बंदच होती. लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या मात्र धावत होत्या. परिणामी एसटीतून किंवा लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडीतून प्रवास केल्यास करोना होत नाही का, असा संतप्त सवाल चाकरमान्यांकडून विचारला जात होता.
गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वे बंदमुळे अनेक चाकरमानी 100 ते 150 किलोमीटरचे अंतर आपापल्या खासगी गाडीने पार करत कार्यालय गाठत होते. परिणामी जवळपास संपूर्ण पगारच पेट्रोलमध्ये खर्च होत होता; परंतु नोकरी टिकावी, या एकमेव हेतूने हे चाकरमानी विनातक्रार ये-जा करत होते. रेल्वे पूर्ववत सुरू होणार असल्याने अशा अपडाऊन करणाऱ्यांच्या त्रासाला आता पूर्णविराम मिळणार आहे.
दरम्यान, मार्गदर्शक तत्त्वे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून योग्य खबरदारी घेत राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.