नवी दिल्ली – कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळण्यासाठी पक्षाने प्रियंका गांधींना सक्रिय राजकारणात उतरवले. परंतु कॉंग्रेसचे प्रियांका कार्ड फेल झालेले दिसत आहे. इतकेच नव्हे तर कॉंग्रेसला पारंपरिक मतदारसंघ अमेठीतही जिंकता आले नाही. उत्तर प्रदेशातल्या 80 पैकी 67 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसला फक्त रायबरेलीची एक जागा जिंकता आली. तिथेही सोनिया गांधी उभ्या असल्याने आणि सपा-बसपाने ती जागा सोडल्याने काँग्रेसला किमान खातं उघडता आलं.
लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झालं आहे. अनेक राज्यांमध्ये तर काँग्रेसला खातंही खोलता आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून त्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. पराभवाची जबाबदारी घेत पक्ष पातळीवर अनेक नेते राजीनामे देत असून राहुल गांधी यांच्या ऑफिसमध्ये राजीनाम्यांचा पाऊस पडला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी घेत राज बब्बर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा राहुल गांधीकडे पाठविला आहे. बब्बर यांच्यापाठोपाठ ओडिशाचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अमेठीचे जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीही जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.