पुणे – लोकमान्य टिळक स्मृतिशताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी हे एकत्र असणे एक योगायोग आहे. हे दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिशताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समारोह कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, कुलगुरू डॉ. नितीन करमळकरसह आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, या दोन्ही महापुरुषांनी कोणत्याही परिणामांची पर्वा न करता आपले परखड मत मांडले. अण्णा भाऊंचे नाव घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळ पूर्ण होऊ शकत नाही.
दरम्यान, लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे या दोघांनी स्वातंत्र्यासाठी एका योद्ध्यासारखे काम केले आहे. या दोन्ही स्वातंत्र्य सेनानींच्या नावाने पुणे विद्यापीठात अध्यासने असून त्यामार्फत त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे, असे कुलगुरूंनी सांगितले.