– अमित डोंगरे
इंग्लंडने भारताचा तिसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 76 धावांची पराभव केला. खरेतर हा पराभव होता की भारतीय संघानेच तो ओढवला. सोकॉल्ड समिक्षक आता भारतीय संघाच्या कामगिरीचे पोस्टमार्टेम करतील आणि काही सल्लेही देतील. मात्र, एक निश्चित की भारताच्या पहिल्या पाच प्रमुख फलंदाजांना ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला बॅट लावण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यामुळेच हा दारुण पराभव पत्करावा लागला.
नॉटिंगहॅमच्या पहिल्या कसोटीपासून सातत्याने हे घडताना दिसत आहे. आऊट साइड ऑफ स्टम्प गोलंदाजी सुरू असताना आणि तीन स्लीप, गली, पॉइंट असे क्षेत्ररक्षण लावलेले असताना व्ही मध्ये खेळण्याच्या जागी आपले फलंदाज बाहेरच्या चेंडूला बॅट लावून तू आधी का मी आधी या थाटात बाद होत गेले. जे नॉटिंगहॅममध्ये घडले तेच लॉर्डसवरही घडले. मात्र. ती कसोटी आपण जिंकली त्यामुळे त्यावर जास्त चर्चा झाली नाही.
तिसरा सामना हरलो त्यानंतर पुन्हा या चर्चेने जोर धरला. लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत यांनी ज्या पद्धतीने बाहेरच्या चेंडूला बॅट लावली ती पाहता विरेंद्र सेहवाग म्हणायचा त्याची आठवण येते. जर तुम्हाला बाहेरच्या चेंडूला बॅट लावण्याचा मोह आवरता येत नसेल तर अशा चेंडूवर इतका जोरदार फटका मारा की तो स्लीप किंवा गलीच्या डोक्यावरून चेंडू चौकार जाईल, केवळ हळुवार स्पर्श कशाला.
तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात आपण 78 धावांत बाद झालो. त्यानंतर इंग्लंडने चारशेपेक्षा जास्त धावा करत मोठे आव्हान ठेवले. सुरुवात खराब झाल्यावर रोहित शर्मा व पुजारा यांनी डाव सावरला होता. मात्र, पंचांच्या चुकीमुळे आणि डीआरएसच्या अनाकलनीय नियमामुळे रोहितचा बळी गेला. त्यानंतरही पुजाराने कर्णधार कोहलीच्या साथीत चांगली खेळी करत संघाला आश्वासक स्थिती प्राप्त करून दिली होती.
मात्र, चौथ्या दिवशी पुजारा इनस्विंगरवर चकला आणि त्यानंतर आयाराम गयाराम हेच सुरू झाले. कोहली व रहाणे ज्या पद्धतीने बाद झाले त्याची शिक्षा म्हणून या दोघांनाच संघातून बाहेर बसवले गेले पाहिजे. प्रत्येक सामन्यात सर्व काही सुरळीत सुरू असतानाच आत्मघात झाला.
कोहली व रहाणे चांगले खेळत असताना विनाकारण बाहेरच्या चेंडूला बॅट लावण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही आणि तिथेच संघाचा पराभव स्पष्ट झाला. अर्थात हे काही पहिल्यांदा घडलेले नाही. बाहेरच्या चेंडूला बॅट लावण्याचा मोह आपण पुर्वांपार करत आलो आहोत. त्यातून सचिन, सेहवागने अप्पर कट हा फटका शोधून काढला व तो यशस्वीही करून दाखवला. आताच्या संघात जे फलंदाज आहेत त्यांना हाच मोह या मालिकेतील पहिल्या तीनही सामन्यात आवरता आला नाही. आता उर्वरित दोन कसोटीत हा मोह आवरला तरच विजय गवसेल.