नवी दिल्ली – लोकसभेचे मंगळवारचे कामकाज पुन्हा मध्यरात्री 11 वाजून 59 मिनीटांपर्यत चालले. कृषी आणि ग्रामीण विकास खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेची प्रक्रिया कालच पुर्ण करण्यात आली. लोकसभेचे कामकाज मध्यरात्रीपर्यंत चालल्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. गेल्या 11 जुलैला रेल्वेच्या अनुदान मागण्यावरही अशीच मध्यरात्रीपर्यंत लोकसभेत चर्चा सुरू राहिली होती. काल दुपारी कृषी आणि ग्रामीण विकास खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चा 2 वाजून 45 मिनीटांनी सुरू झाली. आणि त्या चर्चेत 90 सदस्यांनी भाग घेतला.
ही चर्चा अधिक लांबण्याची शक्यता असल्याने सभापती बिर्ला यांनी 11 वाजून 59 मिनीटांनी हे कामकाज स्थगित केले. हे कामकाज पुढे सुरू ठेवले असते तर तांत्रिक कारणासाठी ते मध्यरात्री तीन वाजपर्यंच चालवावे लागले असते. म्हणून त्यांनी ते आटोपते घेतले.
देशातील सारेच शेतकरी सध्या संकटात सापडले असताना त्यांच्या मदतीसाठी सरकारचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची टीका बहुतांशी विरोधी सदस्यांनी केली. शेतकऱ्यांना पुरेसे पाणी, चांगले बियाणे आणि वेळेपवर पतपुरवठा केला जावा अशी सुचना विरोधी सदस्यांनी सरकारला केली तर सरकारी बाजूकडून शेतकऱ्यांसाठी केल्या गेलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देऊन विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला.