आगामी लोकसभा निवडणुकीला अद्याप सुमारे दीड-दोन वर्षाचा कालावधी बाकी असला, तरी देशातील प्रमुख राजकीय पक्ष मात्र आतापासूनच इलेक्शन मोडमध्ये गेल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने “भारत जोडो’ यात्रेला प्रारंभ केला आहे. कन्याकुमारी येथून सुरू होणारी ही भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे अपयश लोकांसमोर आणण्यासाठी ही यात्रा असल्याचे कॉंग्रेसने स्पष्ट केले असल्याने आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ही “भारत जोडो’ यात्रा कॉंग्रेस पक्षासाठी निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे.
दुसरीकडे नेहमीच इलेक्शन मोडमध्ये असणाऱ्या भाजपने आगामी निवडणुका लक्षात घेऊन काही निर्णय घ्यायला आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच कालावधी बाकी असला तरी देशात इतरत्र काही निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये मुंबई महापालिकासारख्या महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूक आहे किंवा गुजरातसारख्या राज्यातील विधानसभा निवडणूकही महत्त्वाची आहे. साहजिकच यानिमित्ताने पक्षाचे नाव चर्चेत ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आता इलेक्शन मोडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजदबरोबर युती केली असली तरी सध्या ते विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या समोर एखादा सक्षम चेहरा उभा करण्यासाठी या हालचाली आहेत, हे उघड आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल अशी घोषणा त्यांनी केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर सतत संपर्क साधून आगामी संभाव्य राजकारणाची चुणूक दाखवून दिली आहे. अर्थात, आगामी निवडणुका लक्षात घेऊन वातावरणनिर्मिती करणं वेगळं आणि प्रत्यक्ष इलेक्शन मोडमध्ये जाऊन एखादे नियोजन करणं वेगळं. या बाबतीत मात्र भाजपने इतर सर्वच राजकीय पक्षांवर नेहमीसारखीच आघाडी घेतलेली दिसते. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण प्लॅन तयार करण्यात आला आहे. ज्या मतदारसंघात भाजपाला अद्याप विजय मिळवता आलेला नाही अशा 144 मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे आणि त्या दृष्टिकोनातून पावलेही टाकण्यात येत आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघामध्ये ज्याप्रकारे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेत्यांनी दौरा केला हा या राजकारणाचाच एक भाग मानावा लागेल. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये येऊन मुंबई महापालिका निवडणुकीबाबत जी गर्जना केली आहे तीसुद्धा भाजपचा या इलेक्शन मोडचे ताजे उदाहरण मानावे लागेल. बूथ मॅनेजमेंटच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचे नियोजन करणाऱ्या अमित शहा यांनी आतापर्यंत एकदाही विजय न मिळवलेल्या 144 मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे, हे महत्त्वाचे आहे. कारण या 144 पैकी थोड्या जरी मतदारसंघात भाजपाचे उमेदवार निवडून आले तरी त्याचा भाजपाला फायदा होणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीबाबतही अमित शहा यांनी अशाच प्रकारचे नियोजन केले आहे. मुंबईतील पदाधिकाऱ्यांना दीडशेपेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट देतानाच त्यांनी एका समीकरणाची मांडणी त्यांना करून दिली आहे. भाजपाने मुंबई महापालिकेत गेल्या वर्षी जिंकलेल्या सर्व 82 जागा पुन्हा निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवतानाच ज्या जागांवर भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते त्या जागाही निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच इतर राजकीय पक्षांतील जे उमेदवार हमखास निवडून येऊ शकतात अशांना भाजपमध्ये सामील करून घेण्याची रणनीतीही आखण्यात आली आहे. म्हणजे केवळ वातावरणनिर्मिती करून भागणार नाही, तर कागदावर योग्य नियोजन करावे लागेल याचा धडा भाजपने या निमित्ताने इतर राजकीय पक्षांना घालून दिला आहे.
कॉंग्रेसने जी साडेतीन हजार किलोमीटरची भारत जोडो यात्रा आयोजित केली आहे त्या यात्रेचाही कॉंग्रेसला निश्चितच थोड्याफार प्रमाणात फायदा होईल. पण पक्षसंघटन कशा प्रकारे या यात्रेचा उपयोग करून घेतो हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. राजधानी दिल्लीतील महामेळावा असो किंवा राहुल गांधी यांचा गुजरात दौरा दोन्ही घटनांमध्ये कॉंग्रेसने वातावरण निर्मिती करण्यात चांगले यश मिळवले असे दिसून येते. पण या भांडवलावर प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये फायदा कसा करून घ्यायचा हे मात्र पक्षाला निश्चितपणे ठरवून घ्यावे लागणार आहे. नितीशकुमार असोत ममता बॅनर्जी असोत किंवा तेलंगणामधील नेते असोत त्यांनी स्वतंत्रपणे जर प्रयत्न केले तर मोदी यांच्या विरोधात एकमुखी सक्षम नेतृत्व उभे राहू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊनच या पक्षांना आता विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम करत इलेक्शन मोडमध्ये जावे लागणार आहे.
भाजपच्या नेत्यांनी बारामती लक्ष्य केल्याने त्यांच्यावर टीका केली जात असली, तर अशाच प्रकारचा उपक्रम राष्ट्रवादीचे नेते किंवा कॉंग्रेसचे नेते भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्येसुद्धा करू शकतात, ही साधी गोष्टही लक्षात घ्यायला हवी. महाराष्ट्रात मुंबई महापालिका किंवा इतर महापालिकांच्या निवडणुका आता फारशा लांब राहिलेल्या नाही. त्यामुळे या इलेक्शन मोडच्या तयारीचा निश्चित किती आणि कसा फायदा कोणाला होणार आहे त्याची लिटमस टेस्ट मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालावर स्पष्ट होणार आहे. अर्थात, केवळ वातावरणनिर्मिती करून काहीही साध्य होत नाही. काहीतरी निश्चित असे नियोजन असेल तरच निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष चांगले यश मिळू शकते, असे आजवर सिद्ध झालेले आहे. त्यामुळे जो राजकीय पक्ष इलेक्शन मोडमध्ये जातानाच योग्य रणनीतीची आखणी करेल त्याच राजकीय पक्षाला आगामी कालावधीतील निवडणुकांमध्ये चांगले यश मिळू शकते, हे लक्षात घ्यावे लागणार आहे.