नवी दिल्ली – पंजाबमध्ये पुन्हा शिरोमणी अकाली दल-भाजपची युती होणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात जोर धरू लागला आहे. कारण नविन संसदेच्या उदघाट्न सोहळ्याला शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख नेते सुखबीर सिंह बादल यांची असलेली उपस्थिती. तसेच जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांचा झालेला पराभव. यामुळे देखील दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.
जालंधरमध्ये अकाली दलाने बसपासोबत युती करून ही निवडणूक लढवली होती. या पोटनिवडणुकीतील पराभवामुळे चर्चेला पुन्हा एकदा ऊत आला आहे. एकत्र असतो तर जिंकलो असतो, असे शिरोमणी अकाली दलाने स्पष्ट केले.
भाजप देखील एकटाच रिंगणात होता. दोन्ही पक्षांची मते दुसऱ्या क्रमांकावरील कॉंग्रेसपेक्षा जास्त, तर “आप’च्या विजयी उमेदवारापेक्षा काही हजारांनी कमी होती. त्यामुळे शिअद-भाजपने ही निवडणूक एकत्र येऊन लढवली असती, तर चित्र वेगळे दिसले असते, असा दावा केला जात आहे.
शेतकरी आंदोलनावेळी अकाली दलाने भाजपसोबतची युती तोडली होती. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारमधील अकालीच्या एकमेव मंत्री हरसिमरत बादल यांनी राजीनामा दिला होता. या दोन्ही पक्षांची तब्बल 21 वर्षे युती होती. त्यांचे तीनदा सरकार आले. विधानसभेच्या अनेक जागांवर हे पक्ष एकमेकांवर अवलंबून होते.