एकट्या राहुल गांधींना दोष देता येणार नाहीं
मुंबई – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभव ही कॉंग्रेस पक्षाच्या सामुहिक नेतृत्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी एकट्या राहुल गांधी यांना जबाबदार धरता येणार नाही असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. सर्व राज्यांतील प्रदेश पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले पाहिजेत असे मतही त्यांनी व्यक्त केले. मी आणि माझे सहकारीही राज्यातील कॉंग्रेसच्या अपयशाबद्दल राजीनामा देण्यास तयार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीत स्वता अशोक चव्हाण हे नांदेड मतदार संघातून पराभूत झाले आहेत. राज्यात अन्यत्रही कॉंग्रेसच्या वाट्याला दारूण पराभव आला असून कॉंग्रेसचा एकमेव उमेदवार चंद्रपुरहून जिंकला आहे. या संबंधात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की निवडणूक काळात प्रत्येकाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न झाला. पण तरीही पराभव पदरी पडला असला तरी आम्ही या काळात ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करणार आहोत.
या संबंधात सर्व ठिकाणाहून अहवाल मागवण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात कॉंग्रेस आघाडीला नऊ ते दहा ठिकाणी फटका बसला हे त्यांनी मान्य केले. ही आघाडी भाजपची बी टीम होती अशी टिपण्णीही त्यांनी केली. लोकसभेत आम्ही हरलो असलो तरी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळे दिसेल असे ते म्हणाले.