विश्रांतवाडी, दि. 11 (प्रतिनिधी) -लोहगाव-वाघोली मुख्य रस्त्यावर कमरेइतके पाणी साचले असून दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यात बंद पडत आहेत. नागरिक अक्षरशः पाण्यात पडत आहेत. सणासुदीचे दिवस असताना मुख्य रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. नेहमीच्या या समस्येने नागरिक त्रस्त असून ही समस्या सोडविली नाही तर साचलेल्या पाण्यात थांबून 15 ऑगस्टला झेंडावंदन करू, असा इशारा लोहगाव-वाघोली रोड नागरिक विकासमंचने दिला आहे.
पावसाळी लाइन नसल्याने लोहगाव परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचून आहे. पाणी वाहून जाणारे नैसर्गिक स्रोत पुढे बंद केल्याने रस्त्यावरच पाणी साचून राहात आहे. महापालिकेचा पथ विभाग आणि मल:निसारण विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने पाणी आठवडा भर झाले साचून आहे. कमरे इतके पाणी सुमारे 500 मीटर अंतरापर्यंत आहे. महापालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. आमदार सुनील टिंगरे यांच्याही समस्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी याबाबत तातडीने महापालिका आयुक्तांशी बोलून पाण्याचा तातडीने निचरा करण्याची सूचना दिली.
पाणी साचून आहे तर ड्रेनेज लाइन मधून जाणारे पाणी निचरा होत होते. मात्र, त्यामध्ये गाळ साचल्यामुळे पाणी साचत आहे. याता वाहने बंद पडत आहेत, ऍम्ब्युलन्स योग्य ठिकाणी जाताना वाहतूक कोंडीचा मोठा अडथळा पार करावा लागत आहे. यातून स्कुलबस उशिरा शाळेत पोहचत आहेत. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर मलनि:सारण विभाग म्हणते पाण्याचा निचरा करण्याचे आमचे काम नाही. पथ विभागाला संपर्क केला असता पथ विभाग म्हणते मल:निसारण विभागाचे काम आहे.
वाहतूक कोंडी होत असून ऍम्ब्युलन्स पाण्यात अडकत आहे. टेम्पो, दुचाकी घसरून अपघात होत आहेत.