पुणे – भारताला ऐतिहासिक वास्तू, कला आदींचा मोठा वारसा आहे. ही वारसा स्थळे पाहण्यासाठी देश-विदेशातून नागरिक गर्दी करतात. नेहमी प्रेक्षकांच्या गर्दीने फुलणारी वारसा स्थळे सध्या ओस पडली आहेत. नागरिकांना सध्या ही वारसा स्थळे, संग्रहालये ऑनलाइन पाहता यावीत, यासाठी विविध यंत्रणांकडून “थ्रीडी क्लिप’, “व्हिडीओ’ आदीचा पर्याय स्वीकारला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्कोने दि. 18 एप्रिल 1982 रोजी जगातील प्राचीन वास्तुवारसा जपण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. त्यानंतर जगभरमध्ये दरवर्षी 18 एप्रिल हाच दिवस “जागतिक वारसा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
लॉकडाऊनमुळे 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन ऑनलाइन साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. “शेअर्ड कल्चर्स,शेअर्ड हेरीटेज, शेअर्ड रीस्पॉन्सिबिलिटी’ असे या वेळच्या जागतिक वारसा दिनाचे घोष वाक्य असून, सोशल मीडियावर याविषयी विचार, छायाचित्रे, लेख प्रसारित करावेत. जागतिक वारसा स्थळांना दिलेल्या भेटींचे फोटो शेअर करावे, असे आवाहन “ढेपे वाडा सांस्कृतिक मंच’चे नितीन ढेपे यांनी केले आहे.
आपल्याला लाभलेल्या ऐतिहासिक वारशाबाबत अनेकांच्या मनात उद्विग्नता आहे. सरकारी यंत्रणांसह सर्वसामान्य नागरिकांना देखील याबाबत गांभीर्य नसल्याने, समृद्ध वारसा दुर्लक्षित राहिला आहे. आपल्याकडे असणारे ऐतिहासिक वारसा स्थळांचे ऐश्वर्य, प्राचीन कला, शैली आदींचा विसर पडत आहे. प्राचीन, पुरातन मंदिरे पाडून सिमेंट, विटांची मंदिरे उभारण्यात येत आहेत. पुढच्या पिढीसाठी या वारशाचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत इतिहास अभ्यासक सुरेश शिंदे यांनी व्यक्त केले.
पुण्यातील वारशाकडे लक्ष देण्याची गरज…
शनिवारवाडा हे महाराष्ट्राचे भूषण आहे, त्याला गौरवशाली इतिहास आहे. ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. आज, शनिवारवाड्यामध्ये ऐतिहासिक वास्तू म्हणून फक्त भिंती आणि आतील रचनेतील थोडे फार अवशेष आहेत. पण, शनिवारवाड्याच्या भोवतालची परिस्थिती पाहिली तर विषण्णता येते. शनिवारवाड्याचे मूळ दरवाज्यांप्रमाणे, आज भारतामध्ये खूप कमी मूळ दरवाजे शिल्लक आहेत. दरवाजांच्या परिसरात कचरा, वाळलेली पाने आदी पाहून दुर्घटना घडण्याची भीती निर्माण होते.
पुरातत्व खात्याने दुर्घटनेचा धोका ओळखून परिसर व्यवस्थित ठेवण्यासह शनिवारवाड्याचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले. ऐतिहासिक वास्तू पाहताना नागरिकांनी वास्तूचे नुकसान होणार नाही, त्याच्या भिंतीवर काही लिखाण करणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. शहराच्या जवळच्या किल्ल्यांवर वास्तूच्या प्रेमापेक्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी घेण्यासतही जाणाऱ्यानी देखील किल्ल्यांच्या संवर्धनाकडे लक्ष दिले पाहिजे, असेही बलकवडे यांनी सांगितले.