मुंबई – राज्यातील करोनाची स्थिती अतिशय बिकट असून संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी आज रात्री आठ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरू नका. अन्यथा, पोलीस कारवाई करतील, असा इशारा दिला आहे.
राज्यात बुधवारी (दि. 14) रात्रीपासून 1 मेपर्यंत संचारबंदी लागू होणार आहे. या काळात नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्हा अंतर्गत आणि इतर राज्यातूनही वाहतूक प्रवास करता येईल. मात्र, विनाकारण बाहेर पडल्यास पोलीस कारवाई करतील. वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीची व्यवस्था करण्यात आली आहे. मागच्या वेळेची टाळेबंदी आणि आत्ताचे संचारबंदी यामध्ये फरक आहे. मात्र लोकांनी स्वतःहून काळजी घेणे गरजेचे आहे, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.
कडक निर्बंध लावत सरकारने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे केवळ धूळफेक असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर गृहमंत्री म्हणाले की, फडणवीस यांच्या टीकेला काही अर्थ नाही. सरकारने गोरगरिबांसाठी जे पॅकेज जाहीर केले आहे, त्याचा लोकांना संचारबंदीच्या काळात फायदाच होणार आहे.
दुसरीकडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी विचारले असता त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. ते चौकशीला सामोरे जात आहेत. त्यामुळे चौकशी सुरू असताना त्यावर आता बोलणे योग्य होणार नाही, असे ते म्हणाले.