नवी दिल्ली -करोना रुग्ण वाढत असल्यामुळे बऱ्याच शहरांमध्ये मर्यादित प्रमाणात लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि मालाच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्याचा थेट परिणाम आगामी काळातील औद्योगिक उत्पादनावर आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवर होणार आहे असे उद्योग महासंघाने म्हटले आहे.
महासंघाने आपल्या देशभरातील प्रतिनिधींना विचारणा करून तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की काही शहरांमध्ये मर्यादित स्वरूपात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर काही शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अर्थातच याचा वाहतुकीवर परिणाम संभवतो.
त्यामुळे बरेच कामगार आणि कर्मचारी परत आपल्या गावी जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे कामगारांची उपलब्धता निर्माण होण्यास वेळ लागेल. त्याचबरोबर कच्च्या आणि पक्क्या मालाची वाहतूक थंडावली आहे. त्याचा परिणाम आगामी काळातील काही महिन्याच्या औद्योगिक उत्पादनावर होऊ शकतो.
पुन्हा ही परिस्थिती पूर्ववत होण्यास बराच काळ लागू शकतो. त्याचा औद्योगिक उत्पादनावर आणि राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम होणे साहजिक आहे. उत्पादनावर काही महिने तरी 50 टक्के परिणाम संभवतो. या संदर्भातील माहिती उद्योग महासंघाने अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाला कळविली आहे. या सर्व बाबींचा विचार करून आगामी काळात सरकारला आणि उद्योग क्षेत्राला काम करावे लागणार आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
उद्योग महासंघाचे नियोजित अध्यक्ष टी व्ही नरेंद्रन यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकारला मनुष्यहानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. मात्र सरकारने उद्योग क्षेत्राला विश्वासात घेऊन या बाबी करण्याची गरज आहे.
कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे गरजेचे
सध्याच्या परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची गरज वाढली आहे. यासाठी कंपन्यांनी अगोदरच सरकारला सहकार्य करण्याचे ठरविले आहे. बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्याच्या लसीकरणासाठी खर्च करण्यास तयार आहेत. सरकारने जर ही लस औद्योगिक क्षेत्राला उपलब्ध केली तर त्यामुळे कर्मचाऱ्यांचे लसीकरण वेगात होऊ शकेल व कारखान्यांतील वातावरण सुरक्षित होईल. अशा परिस्थितीमध्ये उद्योगक्षेत्रात थोडासा आत्मविश्वास निर्माण होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.