उपमुख्यमंत्री पवार : जनतेला दोन दिवसांचा वेळ देणार
पुणे -राज्यात लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लावले जात आहेत. लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही, पण लावावेच लागले तर दोन दिवस आधी सांगितले जाईल. लोकांना आवश्यक वस्तू घेण्यासाठी, इच्छितस्थळी जाण्यासाठी वेळ मिळेल. कुठलाही कठोर निर्णय घेण्याआधी नागरिकांचा विचार करण्यात येईल, असा निर्णय रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पवार हे मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ल्यानंतर सुरुवातीला नागरिक घाबरत होते. भेटण्याचेदेखील टाळत होते. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. यापूर्वी एक बाधित पाच जणांना बाधित करत होता, तर यावेळेस ही संख्या वाढली असून बाधित व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाला बाधा होत असल्याचे निदर्शनास आले आले आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता नसल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
पीएमपी बंदचा निर्णय बापट यांच्या उपस्थितीतच
पीएमपीची सेवा बंद केल्याने खासदार गिरीश बापट यांनी यास विरोध केला आहे. यावर पवार म्हणाले, शहरातील करोनाची स्थिती पाहता अधिक कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात शुक्रवारी तब्बल तीन तास बैठक झाली. यावेळी आमदार, खासदार, महापौर उपस्थित होते. साधक-बाधक चर्चा होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार बापट यांच्यासमोर बैठकीत निर्णय झाले आहेत. आतली चर्चा बाहेर करायची नसते, पण सर्वांनी चर्चा करून निर्णय घेतला आहे.
फक्त पुण्यातूनच नाहीतर राज्यातून लॉकडाऊनला विरोध होत आहे. पण, लोक ऐकतच नसतील तर पर्याय नाही. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्या बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रमाणानुसार दि.15 एप्रिलपर्यंत काय परिस्थिती होईल, याची माहिती केंद्र शासनानेही दिली आहे.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री