मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची वाढती संख्या वाढतया असून पुन्हा एकदा राज्यात लॉकडाउन होणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान, या प्रश्नावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल असे म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधासहीत मोकळेपणाने रहायचे आहे हे जनतेने ठरवावं, असे म्हटले होते.
“स्थानिक जिल्हाधिकारी, आयुक्तांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या स्तरावर करोना नियंत्रित करण्यासाठी ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे त्या त्यांनी कराव्यात अशी सूचना आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत तिथे या उपाययोजना केल्या जातील. मात्र लॉकडाउन हा सर्वात शेवटचा पर्याय असेल. याचा अर्थ आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. गरज लागेल त्याप्रमाणे काळजी घेतली जाईल,” असे राजेश टोपे म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “फार मोठी संख्या वाढली आहे अशातला भाग नाही. जरुर चार पाचशेंनी वाढते, परत दोन तीनशेंनी कमी होते. त्यामुळे दररोज अडीच तीन हजाराने रुग्ण वाढण्याचे प्रमाण गेल्या दोन महिन्यांपासून आहे. पण करोनाचा प्रभाव आता कमी झाला आहे. किरकोळ स्वरुपात वाढला आहे, नाही असे नाही. आज फक्त ३६०० आहेत, कालच्या तुलनेत कमी झालेत. त्यामुळे चिंता करण्याचा विषय नाही. पण काळजी जरुर घेतली पाहिजे”.
“जिथे खूप गर्दी असते तिथे सातत्याने करोना चाचणी करणं, अधिक कठोर पद्धतीने नियमांचं पालन करणं महत्वाचा विषय वाटतो,” असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. “मुंबई लोकलचा दुसरा टप्पा सुरु झाल्यामुळे करोना रुग्ण वाढलेत अशातला भाग नाही. मुंबईच्या आयुक्तांनीही फार वाढ झालेली नाही आणि होणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यांनी खात्री दिली आहे. पण आपल्याला काटेकोरपणे नियमांचं पालन करावं लागेलच,” यावर राजेश टोपे यांनी जोर दिला.