मुंबई – मागील काही दिवसांपासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. पण, पुन्हा पुर्वीप्रमाणे कडक लॉकडाऊन लागेल, या भीतीने मुंबईत काम करणारे इतर राज्यातील प्रवासी मजुर आपल्या गावाची वाट धरत आहेत.
गावाकडे जाणाऱ्या मजुरांची प्रचंड संख्येने गर्दी सध्या रेल्वे स्टेशनवर दिसत आहे. भिवंडी, ठाण्यासारख्या परिसरातून मोठ्या संख्येने मजुरांचे पलायन सुरू आहे. मागच्या वर्षी अचानक लागलेल्या लॉकडाऊनमुळे जो त्रास सहन करावा लागला, तो त्रास पुन्हा सहन करावा लागू नये, यामुळे हे मजुर आताच आपाल्या गावाकडे निघत आहेत.
मुंबईच्या लोकमान्य तिळक टर्मिनस स्टेशनवर रविवारपासून दररोज प्रवासी मजुरांची गर्दी वाढताना दिसत आहे. लोक आपले सामान आणि कुटुंबासह स्टेशवर जमा होत आहेत. स्टेशनवर रिजर्वेशनशिवाय प्रवेश मिळत नाहीये, यामुळे तिकीट खिडकींवर मजुरांची प्रचंड गर्दी जमत आहे.
उत्तर प्रदेशातील बांदाचे रहिवासी असलेले राजेश परिहार मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून सिक्योरिटी गार्डचे काम करतात. लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने कंपनीने एका आठवड्यापूर्वी त्यांना कामावरुन काढून टाकले. मुंबईत राहण्यासाठी पैसे नसल्यामुळे आता ते आपल्या गावाकडे जात आहेत.