सोलापूर – सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक उपाययोजना करूनही करोना रुग्ण संख्या कमी होत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने शनिवार, दिनांक 8 मे रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून ते 15 मे रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत मेडिकल, बॅंका, वर्तमानपत्रे या अत्यावश्यक सेवा वगळता किराणा, भाजीपाला, दूध विक्री या सेवा बंद राहणार आहेत. दूध विक्रीही केवळ घरपोच राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
सध्या दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू सुरू असलेली सर्व किराणा दुकाने, बाजार समितीतील शेतमालांचे लिलाव, भाजीपाला विक्री, दुकानातून दूध विक्री व अन्य सेवा बंद राहणार आहेत. मटण, चिकन व अंडी विक्रीही बंदच ठेवण्यात येणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बॅंका मात्र सुरू राहणार आहेत. तसेच शेतीशी निगडित खते, बी-बियाणे, आवजारे आदींची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहतील. ई पास असणाऱ्यांना घरपोच दूध विक्री करता येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोविड लसीकरणासाठी जाण्यास नागरिकांना मुभा देण्यात येणार आहे. परंतु आधारकार्ड किंवा ओळखीचा अन्य पुरावा सोबत न्यावा लागणार आहे.