मुंबई: लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना त्याचे बुमरॅंग होऊ देता कामा नये, अशी सूचना शिवसेनेने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखातून केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्याकाळात करोनाच्या प्रमाणात कुठेही घट होताना दिसत नाही.
अनलॉकमुळे देशापुढील आव्हाने वाढण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे सरकारला कठोरच राहावे लागेल. अर्थात लॉकडाऊच्या काळातही देशातील करोनाग्रस्तांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता नागीरकांनीच स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याची छायाचित्रे झळकली आहेत, त्याचा संदर्भ देऊन शिवसेनेने म्हटले आहे की, अशीच स्थिती राहणार असेल तर गंभीर प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील लॉकडाऊन त्वरेने उठवणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान्य नव्हते; पण अन्य राजकीय पक्षांनी हे लॉकडाऊन उठवण्याची गरज व्यक्त केली होती याकडेही यात लक्ष वेधण्यात आले आहे. महाराष्ट्रात मिशन बिगन अगेन नावाने लॉकडाऊन काही प्रमाणात उठवण्यात आल्यानंतर लोकांनी बेशिस्त पद्धतीने वागणे सुरू केले असल्याचे निरीक्षणही शिवसेनेने या अग्रलेखात नोंदवले आहे.