मुंबई : गृहमंत्रालयाच्या आदेशाबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु 3 मेपर्यंत लॉकडाऊनच्या नियमात कोणतीही शिथिलता ठेवण्यात येणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने काल रात्री उशिरा काही निर्देश दिले आहेत. ज्यानुसार काही दुकानांना, व्यवहारांना केंद्र सरकारने संमती दिली आहे. मात्र राज्यात असलेली दुकाने सुरु करण्याचा काही प्रश्नच येत नाही. केंद्राने काही निर्णय घेतले आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजेश टोपे म्हणाले, लॉकडाउन हा कदाचित 3 मेपर्यंत जसा आहेत तसाच सुरु राहिल. याबाबतीतला निर्णय 3 मे नंतरच होवू शकेल. मी कदाचित अशासाठी म्हणतो आहे की 27 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होणार आहे. यावेळी परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याच्या विषयासंदर्भात चर्चा केली जाईल. तेव्हा काही वेगळा निर्णय घेतला गेला तर मुख्यमंत्री त्याबाबत माहिती देतील.
राज्यातील आर्थिक चक्र सुरू होण्याची नितांत्य गरज असल्याचे सांगून ते म्हणाले की, जिल्हयाच्या सीमा सीलबंद असल्या तरी औद्योगिक क्षेत्रातील काही घटकांना अर्तगंत परवानगी देण्यात आली आहे. तसेच ग्रीन झोनमध्येही व्यवसाय मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, राज्यात समूह संसर्ग नाही. तसेच अद्याप आपण तिसऱ्या स्टेजलाही गेलो नाही. ग्रीन झोनच्या सीमा बंद ठेवाव्या लागतील. तसेच प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगला संमती मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी चर्चा झाली त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, असेही टोपे यांनी सांगितले.