सोलापूर – करोनापेक्षा जास्त लोक टीबीने दगावले होते, पण टीबीच्या वेळेस लॉकडाऊन करण्यात आला नव्हता. करोनामुळे लॉकडाऊन केल्याने देशतील जनता उपाशी आहे, त्यांच्या रोजगार बुडाला असल्याने त्यांचे जीवनच उद्ध्वस्त झाले आहे. तसेच सर्वसामान्यात करोनाची रिंगटोन लावून भीती निर्माण केली जात आहे. 3 महिने झाले तरी रिंगटोन बदलली नाही, यामागे काय षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी केला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा, असेही ते म्हणाले.
प्रकाश आंबडेकर यांनी करोनाकाळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेल्या कॉलर ट्यूनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, करोनाच्या निमित्ताने शासनाने सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल केले आहे. एकलकोंडी जीवनास भाजपने सुरुवात केली आहे.तसेच केंद्राने जनतेला ब्लॅकमेल करत त्यांचा रोजगार हिसकावून घेतला आहे. यामुळे 30 तारखेची वाट न बघता सामान्य आयुष्य जीवन जगायला सुरुवात करा, असे माझे आवाहन आहे. आरोग्य विभागाने आम्हाला जगवले, लॉकडाऊनमुळे नाही, लॉकडाऊनमुळे अनेक लोक मानसिक रुग्ण झाले, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मोदींवर खुनाचा गुन्हा दाखल करा
हे सरकार कंगाल आहे. त्यामुळे जगात पेट्रोल-डिझेलच्या किमती पडलेल्या असतानाही दररोज इंधनाच्या दरात वाढ केली जात आहे. हा नवीन चोरी करण्याचा प्रकार आहे, हे सरकार संघटित गुन्हेगारांचे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणून कार्यक्रम केला, त्यामुळे कोरोनचा शिरकाव झाला, पंतप्रधानांवर 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे, असा घणाघात आंबेडकरांनी केला.