नवी दिल्ली – केंद्र सरकार करोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केला असताना केंद्राकडूनही लॉकडाऊनचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यानुसार देशातील 150 राज्यांमध्ये लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
आरोग्य सुविधांवर ताण आलेले जिल्हे जिथे पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तिथे लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टींवर निर्बंध आणण्याचा प्रस्ताव मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.
मंगळवारी आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, अंतिम निर्णय राज्य सरकारांसोबत चर्चा केल्यानंतरच केंद्राकडून घेतला जाणार आहे.
या प्रस्तावात नंतर बदल केला जाऊ शकतो. मात्र, या जिल्ह्यांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत बैठकीत मांडण्यात आले. करोनाची साखळी तोडण्यासाठी जास्त पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पुढील काही आठवडे कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.