मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ः तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो
मुंबई : राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता 14 एप्रिलनंतरही लॉकडाउन पुढे कायम ठेवावा लागणार असून तो किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच जनतेने खबरदारी घ्यावी, सरकार जबाबदारी घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला. कोणत्याही उलटसुलट बातम्या येण्याऐवजी मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. आजपर्यंत जे धैर्य दाखवले तसेच यापुढेही दाखवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे खरं आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचे प्रवेशद्वार आहे. आपण तपासण्या सुरु केल्या तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतल्या देशांना बंदी होती. मात्र जे देश यादीत नव्हते त्यातले रुग्ण मिसळले.
आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग सील केले आहेत. जे रुग्ण आपल्याला सापडलेत त्याची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करते आहे. आता समोरुन रुग्ण येण्याची वाट बघत नाही, तर घरी जाऊन चाचण्या करतो आहोत. मुंबईत संख्या 1 हजारांवर गेली आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र ही आपल्याला फक्त कमी करायची नाही तर शून्यावर आणायची आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांत राज्यातील चाचणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला आहे ती संख्या वाढते आहे. ज्यांचं वय जास्त आहे त्यांचा धोका वाढतो आहे. ज्यांना आधीपासून काही विकार आहेत अशा रुग्णांवर करोनाचा गंभीर परिणाम होतो आहे. आकाश पांघरुनी जग हे शांत झोपलेले हे गाणं आठवतं आहे. आकाश तर पांघरलं आहे पण झोप उडाली आहे सगळ्यांची अशी अवस्था आहे असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तुम्हाला वाटेल की परिस्थिती गंभीर असताना मला गाणं कसं सुचतं ? पण आज मला या गाण्याच्या ओळी आठवत आहेत, असे त्यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितले.