पंतप्रधानांनी दिले संकेत ः सरकारसाठी नागरिकांचे जीवन महत्वाचे
– शनिवारी पुन्हा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लागू केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा कालावधी वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. सध्याचा कॉलडाउनचा कालावधी 14 एप्रिलपर्यंत आहे. हा कालावधी आणखी वाढविला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला.
देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या 5000च्या वर गेली आहे. त्यामुळे या स्थितीत लॉकडाऊन संपवून दैनंदिन जनजीवन सुरळीत करणे शक्य नसल्याचे पंतप्रधानांनी प्रमुख राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना सांगितले.पंतप्रधान मोदी येत्या शनिवारी 11 एप्रिलला पुन्हा एकदा देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. त्या दिवशीच लॉकडाऊन वाढवायचा की संपवायचा यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.
सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. इतरही राज्यांमध्ये हळूहळू रुग्ण वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी ठरणारा लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाऊ शकते. करोना विषाणूचे संक्रमण सुरू झाल्यापासून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
पंतप्रधान म्हणाले, संपूर्ण जग सध्या करोनाच्या गंभीर आव्हानाचा सामना करत आहे. सध्याची परिस्थिती मानवजातीच्या इतिहासामधील एक युग बदलणारी घटना आहे. त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी आपण विकसित होण्याची गरज आहे. या महामारीच्या विरोधातील लढ्यात केंद्राबरोबर एकत्रितपणे काम करण्याच्या राज्य सरकारांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. या लढाईत संयुक्त आघाडी उघडण्यासाठी देशातील सर्व राजकारण्यांनी एकत्रित येऊन विधायक आणि सकारात्मक राजकारण केल्याचे संपूर्ण देशाने पाहिले, असे त्यांनी नमूद केले.
या संकटाला सामोरे जाताना प्रत्येक नागरिक आपुलकी, शिस्त, समर्पण आणि बांधिलकीच्या भावनेने देत असलेल्या योगदानाचे, मग ते सामाजिक अंतर, जनता कर्फ्यू किंवा लॉकडाउनचे पालन असेल, या सर्व प्रयनांचे त्यांनी कौतुक केले. संसाधनांच्या कमतरतेच्या रूपाने उदयोन्मुख परिस्थितीचा परिणाम पंतप्रधानांनी अधोरेखित केला. तरीही भारत अद्याप विषाणूच्या प्रसाराच्या वेगावर नियंत्रण ठेवणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक आहे. परिस्थिती सतत बदलत राहते. त्यामुळे प्रत्येकाने कायम दक्ष राहणे आवश्यक आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
देशातील परिस्थिती सामाजिक “आणीबाणी’सारखीच असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशाला कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत आणि सतत दक्ष राहणे आवश्यक आहे. अनेक राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन आणि तज्ञांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची सूचना केली आहे.
या बदलत्या परिस्थितीत देशाने आपली कार्यसंस्कृती आणि कार्यशैलीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाचा जीव वाचवण्यास सरकारचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. देश करोनामुळे उद्भवलेल्या गंभीर आर्थिक आव्हानांना सामोरा जात आहे आणि सरकार या आव्हानांवर मात करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ते म्हणले.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत लाभ वितरित करण्याच्या सद्यस्थितीबरोबरच उदयोन्मुख आव्हानांचा सामना करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सविस्तर सादरीकरण केले. या बैठकीबद्दल नेत्यांनी केंद्राने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. या संकटाच्या वेळी संपूर्ण देश त्यांच्यामागे एकजुटीने उभा असल्याचे सांगितले. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि मनोबल वाढविणे, चाचणी सुविधा वाढविणे, छोटी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करण्याची गरज तसेच उपासमार आणि कुपोषणाच्या आव्हानांचा सामना करण्याबाबत चर्चा केली.
या महामारीविरोधातल्या लढ्यात देशाच्या क्षमता वाढविण्यासाठी आर्थिक आणि अन्य धोरणात्मक उपायांबाबतही चर्चा झाली. लॉकडाउन वाढविण्याबाबत आणि लॉकडाउन संपल्यानंतर टप्प्याटप्प्याने मार्ग खुले करण्याच्या सूचना नेत्यांनी दिल्या.