पुणे व्यापारी महासंघाचे मुख्यमंत्र्यांसह सात जणांना निवेदन
82 संघटनांचे 30 हजार व्यापारी आक्रमक
पुणे – व्यापारासाठी पी-1 आणि पी-2 योजना पुन्हा राबवू नये. पुन्हा लॉकडाऊन जाहीर करू नये, या मागणीचे निवेदन मुख्यंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना देण्यात आले आहे. असा कोणताही निर्णय घेतल्यास महासंघाशी संलग्न 82 संघटनाचे 30 हजार व्यापारी तीव्र विरोध करतील, असे या निवेदनात म्हटाले आहे.
अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांची या निवेदनावर स्वाक्षरी आहे. लॉकडाऊनमुळे 25 मार्चपासून दुकाने बंद आहेत. 19 मेपासून ठराविक दिवसाला दुकान उघडण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर 25 जूनपासून पी-1 आणि पी-2 योजनेनुसार दुकाने उघडण्यास सांग़ितले. त्यामुळे महिन्यात केवळ 15 दिवसच दुकाने उघडी राहु शकली. व्यापाऱ्यांचा जेमतेम 7 ते 8 टक्के व्यवसाय झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने दहा दिवस लॉकडाऊन पुकारला. त्यावेळी व्यापाऱ्यांचा व्यवसाय पुन्हा ठप्प झाला होता. त्यामुळे नवीन लॉकडाऊनबाबत केवळ व्यापारी वर्गामध्ये नव्हे, तर नागरिकांनामध्ये नाराजी आहे. त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची गरज आहे. त्यामुळे दुकाने दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत उघडण्यास परवानगी द्यावी, अथवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत उघडण्यास परवानगी द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. आता यावर प्रशासन काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
व्यापारी म्हणतात…
वास्तविक शनिवार, रविवार या दोन दिवशी व्यवसाय सर्वाधिक होतो. मात्र, गर्दी होऊ नये यासाठी या दोन्ही दिवशी दुकाने बंद ठेवण्यास आम्ही तयार आहोत. मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचे दुकान किमान 3 दिवस बंद ठेवावे, बेजबाबदार नागरिक, नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी. मोठा दंड आकारावा आणि वाहन किमान 8 दिवसांसाठी जप्त करावे, असे पर्याय महासंघाने या निवेदनात सुचविले आहेत.