मारहाण, हल्ल्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ : जुने उट्टे काढण्याची कसर भरणे सुरू
पुणे – लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेकांचे जुने वाद उफाळून आले आहेत. दोन ते तीन महिने पोलिसांच्या भीतीने वावरता न आलेल्यांनी ही कसर लॉकडाऊन शिथिल होताच भरण्यास सुरुवात केली आहे. आता गल्ली-बोळांत पूर्वीच्या वादातून एकमेकांचा काटा काढणे सुरू झाले आहे. यामुळे मे महिन्यात मारहाण आणि हल्ला करण्याच्या प्रकरणांत प्रचंड वाढ झाली आहे.
लॉकडाऊन नियमांतून मे महिन्यात मोठी शिथिलता मिळाली. ठिकठिकाणचा बंदोबस्त आणि बॅरिकेट्स काढण्यासाठी महापालिकेने पोलिसांना सांगितले. त्यामुळे फक्त कंटेन्मेंट झोनपुरताच सध्या बंदोबस्त आहे. त्यामुळे इतक्या दिवस बंदिस्त असल्याने अचानक समोर आपला वैरी दिसल्यावर त्याच्यावर थेट वार करण्याचे प्रकार घडले आहेत.
येरवडा, विमाननगर, चतु:शृंगी, चंदननगर, विश्रांतवाडी आणि खडकी या भागांत मारहाण आणि हल्ला करण्याचे बहुतेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शहर पोलिसांनी यावर्षी 1 जानेवारीपासून 561 शरिराविरुद्धचे गुन्हे दाखल केले आहेत. मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गुन्ह्यांची संख्या बरीच कमी झाली आणि कोणीही घराबाहेर पडू शकत नव्हता, तर रस्त्यांवर कोणीही नव्हते. त्याचवेळी पोलिसांचा बंदोबस्त आणि गस्तही वाढवली. अशा परिस्थितीत मार्चच्या शेवटच्या दोन आठवड्यांत अशा अपराधांचे प्रमाण कमी झाले.
संपूर्ण महिना लॉकडाऊनमध्ये असल्याने एप्रिलमध्ये ही संख्या फक्त 35 पर्यंत घसरली. मात्र, मेमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आणि लोक घराबाहेर पडू लागले. यातूनच एकमेकांकडे बघण्यातून, पूर्वीच्या वादाच्या कारणातून मारहाणीचे गुन्हे वाढले. जूनमध्ये तर “अनलॉक-1′ मिळाल्याने खुनाचे गुन्हे घडले. यामध्ये सराईत आणि जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांचा यात समावेश आहे.
बऱ्याच घटनांमध्ये लोक धारदार शस्त्रे, दगड, रॉड, काठ्या आणि पेव्हर ब्लॉक्सचा वापर हल्ला करण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन काळात गुन्हेगारांनी आपली शस्त्रे चटईखाली ठेवली असतील, पण बदला घेण्यासाठी ही हत्यारे बाहेर काढण्यात आली. बहुतांश घटनांमध्ये पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच संशयितांनाही काही तासांत अटक केली आहे.
लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी केली गेली आणि शहराच्या मध्यवर्ती भागात ती दीर्घ काळापर्यंत सुरू राहिली. त्यामुळे या भागांत गुन्हेगारीचे प्रमाण कमी राहिले. परंतु, येरवडा, चंदननगर, बिबवेवाडी, कोंढवा, हडपसर आणि इतर भागांत लवकर लॉकडाऊन शिथिल झाले. यामुळे या ठिकाणी गुन्हे वाढले
– अशोक मोराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे