सांगली – राज्यात करोना रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. केवळ जीवनावश्यक सुविधा यामध्ये सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र सांगली जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात मंगळवारी करोना रुग्णांची संख्या १५६८ वर पोहोचली तर ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बाब अतिशय गंभीर आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत, असं पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
आपल्याला ऑक्सिजन काठावर मिळतोय. प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावा लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी बुधवार ५ मे रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल, अस पाटील यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान जीवनावश्यक वस्तुंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करतो. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला करोनावर मात करायची आहे. घरीच रहा, सुरक्षित रहा, असंही पाटील यांनी म्हटलं.