संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील करोना रुग्णांचा वाढता आलेख, हा चिंताजनक आहे. यासाठी प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करत आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन, तसेच स्वयंसेवी संघटना प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊन करणे हा अंतिम पर्याय नाही. बिगर लॉकडाऊनचे करोना नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र तरीही नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास तालुक्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचे संकेत महसूलमंत्री थोरात यांनी दिले.
संगमनेर येथील शॅंप्रोच्या प्रांगणात राज्य सरकारला एक वर्षाचा कार्यकाळ झाल्याबद्दल ते पत्रकारांशी बोलत होते. संगमनेर तालुक्यात करोना हा चिंतेचा विषय असला, तरी त्याचा प्रसार हा बाहेरून आलेल्या लोकांमुळेच जास्त झाला आहे. मागील चार महिन्यांत प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते, संघटना यांनी कौतुकास्पद काम केले आहे. आता संगमनेरच्या रुग्णाला नगरला नेण्याची गरज नाही. संगमनेरमध्येच 90 रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आणखी 500 बेडची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे थोरात म्हणाले. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ. हर्षल तांबे आदी उपस्थित होते.
तपासणी झाल्याने होताहेत त्वरीत उपचार
कुरण येथे कोविड सेंटर सुरू केले आहे. तालुक्यातील सर्व कोविड सेंटरची क्षमता 500 बेडची आहे. जिल्ह्यात खासगी व सरकारी कोविड तपासणी करणारा संगमनेर हा पहिला तालुका आहे. तसेच रॅपिड अँटिजेन टेस्टने त्वरित रिपोर्ट मिळत असल्याने तपासणी होऊन त्वरीत उपचार सुरू होत आहेत, असे यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.