संगमनेर : संगमनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आलेख हा चिंताजनक आहे. यासाठी प्रशासन सर्वोतोपरी उपाययोजना करत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन तसेच स्वयंसेवी संघटना प्रयत्न करत आहेत. परंतु नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सर्व नियमांचे पालन करावे.
लॉकडाऊन करणे हा अंतिम पर्याय नाही, बिगर लॉकडाऊनचे करोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो मात्र, तरीही नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास तालुक्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे संकेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
संगमनेर येथील शॅंप्रोच्या प्रांगणात मंत्रिमंडळाच्या 1 वर्षाच्या कार्यकाळाचा उजाळा देतांना ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, संगमनेर तालुक्यात करोना हा चिंतेचा विषय असला तरी त्याचा प्रसार हा बाहेरून आलेल्या लोकांमुळेच जास्त झाला आहे.
गेल्या 4 महिन्यात प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते, संघटना यांनी कौतुकास्पद काम केले आहे. आता संगमनेरच्या रुग्णाला नगरला नेण्याची गरज नाही. कारण संगमनेरमध्येच 90 रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आणखी 500 बेडची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
प्रशासन सर्वोतोपरी उपाययोजना करत आहे असून आपणही येणारे गणेशोत्सव आणि बकर ईद सारखे उत्सव घरातच व शासकीय नियमात साजरे करावे असे आवाहनही महसूलमंत्री थोरात यांनी केले. लग्न, वाढदिवस, पार्ट्या यांसाठी बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी संगमनेरातील कोरोना संक्रमनाचा धोका जास्त वाढला असल्याने येथे जास्त रुग्ण मिळत आहेत. यापुढे प्रशासनाने अधिक कठोर आणि सतर्क होऊन कारवाया कराव्यात असेही त्यांनी प्रशासनाला सांगितले.
यापुढील काळात प्रशासन अधिक सतर्क होऊन नागरिकांनीही सहकार्य करावे कारण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नसून बिगर लॉकडाऊनचेही कोरोना नियंत्रित कसा आणता येईल यावर लक्ष घालणे हे फक्त प्रशासन म्हणून नाही तर नागरिकांचीही तेव्हढीच जबाबदारी असल्याचे महसूलमंत्री थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी डॉ सुधीर तांबे, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ हर्षल तांबे आदी उपस्थित होते.