सातारा – जिल्ह्यासह सातारा शहरातही आता करोनाचे संक्रमण वाढले आहे. लॉकडाऊनमुळे तीन महिने जनजीवन विस्कळीत होऊन लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. आता लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. मात्र, लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून विनाकारण फिरणे, गर्दी करणे अंगलट येत आहे. स्वत:ला मर्यादा घालून स्वयंशिस्त न पाळल्यास करोनाचे संकट अधिक गढद होणार असून तसे झाल्यास पुन्हा स्वत:हून लॉकडाऊन ओढावून घ्यावा लागेल, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जनतेला दिला आहे.
करोनाची साथ वेळीच आटोक्यात येणे अत्यावश्यक बनले आहे. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आणि उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद होती. छोटे उद्योग, व्यवसाय बंद राहिल्याने लोकांचे जगणे मुश्किल झाले होते.
हातावर पोट असणाऱ्या लोकांची उपासमार होत होती. सर्व प्रकारची दुकाने बंद असल्याने जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. आता लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. मात्र, गेल्या आठ- दहा दिवसांत जिल्हा आणि सातारा शहरात करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच असून ही मोठी चिंताजनक बाब आहे.
नागरिक स्वत: मर्यादा पाळत नाहीत, स्वत:ची काळजी घेत नाही, हे महत्वाचे कारण म्हणावे लागले. बाजारपेठ सुरू आहे, म्हणून विनाकारण अनेक लोक फिरतात, गर्दी करतात. मला काही होणार नाही, या भ्रमात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग न पाळणे असे प्रकार अनेक लोकांकडून होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे वाढती रुग्णसंख्या आहे. करोना दरवाजात पोहचला आहे. आता तरी जागे व्हा.
अन्यथा परिस्थिती गंभीर होईल, अशी कळकळीची सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरिकांना केली आहे. स्वत:च स्वत:ची काळजी घेतली तरच करोनापासून बचाव होणार आहे. रुग्णसंख्या वाढतच राहिली तर मात्र पुन्हा लॉकडाऊन अटळ आहे आणि हा लॉकडाऊन स्वत: लोक ओढावून घेणार आहेत. पुन्हा अशी परिस्थती नको असेल तर, लोकांनी स्वयंशिस्त पाळावी आणि विनाकारण बाहेर फिरू नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.