नवी दिल्ली -लॉकडाऊनचे धोरण फसल्याची टीका करणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आला. लॉकडाऊन हे भारताचे यश आहे. राहुल यांची वक्तव्ये चुकीची आहेत, असे भाजपने म्हटले.
राहुल यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या बाजूने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुढे सरसावले. लॉकडाऊनआधी देशात 3 दिवसांनी करोनाबाधितांची संख्या दुप्पट व्हायची. लॉकडाऊननंतर ते प्रमाण 13 दिवसांपर्यंत खाली आले आहे. त्यातून देशाला मिळालेले यश अधोरेखित होते. लॉकडाऊन लागू करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयामुळे इतर देशांच्या तुलनेत भारत अतिशय कमी प्रमाणात प्रभावित होण्याची निश्चिती झाली, असे ते म्हणाले.
देश करोनाविरोधात लढत असताना कॉंग्रेसकडून राजकारण खेळले जात आहे. राहुल यांची पत्रकार परिषद त्याचेच उदाहरण आहे. लॉकडाऊन का लागू केला, असा प्रश्न आधी कॉंग्रेसकडून विचारला जात होता. आता तो पक्ष लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतही सवाल करत आहे. त्यातून कॉंग्रेसचा ढोंगीपणा आणि दुतोंडीपणा उघड होतो. जनतेला अशाप्रकारचे नकारात्मक राजकारण आवडत नाही. त्यामुळेच तो पक्ष जनतेपासून दुरावला आहे, असा शाब्दिक टोला जावडेकर यांनी लगावला.