यवतमाळ -जिल्ह्यात करोना संसर्गाच्या वाढत्या साखळीस तोडण्यासाठी प्रशासनाने अखेर संपूर्ण टाळेबंदीचाच पर्याय निवडला. त्या अनुषंगाने पुसद, दिग्रस पाठोपाठ आता यवतमाळ, पांढरकवडा, नेर व दारव्हा या चार शहरांमध्ये लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी आज घोषित केला. या चारही शहरांसह लगतच्या परिसरात 32 जुलैपर्यंत टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे.
करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचे सांगत प्रशासनाने पुन्हा एकदा सर्व व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी गुरूवारी एक आदेश काढून यवतमाळ, पांढरकवडा, दारव्हा व नेर या चार शहरांसह लगतच्या परिसरात शनिवारपासून 31 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण संचारबंदी घोषित केली.
या काळात आरोग्य सेवा व औषधी दुकाने, शेती, शेती विषयक कामे, दूध विक्री संकलन, शासकीय कार्यालये, बॅंका आदी क्षेत्रांना शासनाच्या निर्देशांप्रमाणे शिथिलता देण्यात आली आहे. बॅंकांचे अंतर्गत कामकाज करण्यास मुभा देण्यात आली असली तरी ग्राहकांसाठी व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसह शासकीय कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी यांनाच चारचाकी व दुचाकी वापरास परवानगी असून इतर व्यक्ती वाहनांचा वापर करताना आढळल्यास वाहन जप्त करून वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व खासगी वाहनांना प्रवासासाठी बंदी घालण्यात आली आहे.
गडचिरोलीची करोनामुक्तीकडे वाटचाल
गडचिरोली जिल्ह्यातील तीन तालुक्यात एकही सक्रिय रूग्ण नसून पाच तालुक्यात एक ते दोन सक्रिय रूग्ण आहेत. उर्वरीत तीन तालुक्यात सहा किंवा सहापेक्षा कमी रूग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यांपैकी 11 तालुके करोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. जिल्ल्हयातील एकूण सक्रिय 251 रूग्णांपैकी 229 एकट्या गडचिरोली तालुक्यातील आहेत. यामध्ये सुरक्षा दलातील करोनाबाधित जवानांचा समावेश मोठया प्रमाणात आहे. इतर तालुक्यात फक्त 22 करोनाबाधित उपचार घेत आहेत.