मुंबई – करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसून देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत झाले आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाकरे सरकारने निर्णय घेतला आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीदेखील बैठकीला हजर होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत लॉकडाउन 31 मे पर्यंत कायम ठेवण्यावर एकमत झाले आहे. यासोबतच उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पण करोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
राज्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 25 हजारांच्या वर गेली आहे. बुधवारी एका दिवसात तब्बल 1495 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत 975 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पाहता राज्यात दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली असून ते कधीपर्यंत वाढवला जाणार आहे याबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही. केंद्र सरकारकडून जोपर्यंत लॉकडाउन 4च्या नव्या अटी-शर्थींची सविस्तर माहिती दिली जात नाही तोपर्यंत राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाणार नाही. केंद्र सरकारने सविस्तर माहिती दिल्यानंतरच राज्य सरकारडून घोषणा केली जाणार आहे.