मुंबई – राज्यातील करोना विषाणूचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने होऊ लागला आहे. दररोज वाढणाऱ्या करोना रुग्णांची संख्या धडकी भरवणारी असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये लॉक डाऊनचा पर्याय अवलंबण्यात येतोय. अशातच देशात करोना रुग्णसंख्या सर्वाधिक वाढत असलेल्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रातील असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लॉक डाऊन करावा लागतो काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील करोना परिस्थितीबाबत व लॉक डाऊनबाबत भाष्य केलं आहे.
मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, “मोठ्या प्रमाणात करोनाचं संकट वाढू लागलं आहे. मुख्यमंत्र्यांसहित सर्वजण आवाहन करत आहेत. काही शहरांमध्ये प्रमाण वाढलं आहे. पालकमंत्री नात्याने उद्या पुण्यात लोकप्रतिनिधींना बोलावालं असून दर शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक होत असते. या बैठकीत आम्ही निर्णय घेतो. लॉक डाऊनसंबंधी मतांतर आहे, पण नियमांचं पालन केलं पाहिजे यावर एकमत आहे,”
“त्यामुळे पक्षीय राजकारण मधे न आणता हे आपल्या सर्वांवरचं संकट आहे या भावनेने आपण करोनाशी लढलं पाहिजे. आम्ही ४५ वर्षापुढील सर्वांचं लसीकरण करण्याची मागणी केली होती ती मान्य झाली आहे. त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार. पण आता ४५ च्या आतील अनेकांना करोना होत आहे. देवगिरी जिथे मी राहतो तिथे अनेक कर्मचारी वास्तव्यास आहेत. काल सगळ्यांची तपासणी केली तर नऊ लोक पॉझिटिव्ह होते. आपल्याला करोनाचा मुकाबला करावाच लागणार आहे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून आर्थिक मदत कम कमी पडू न देण्याची भूमिका आहे,” असंही पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून पुण्यातील करोना रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनातर्फे हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी देखील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या सर्व उपायांचे काटेकोर पालन करावे असं आवाहन करण्यात आलंय.