मुंबई – राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेला लाॅकडाऊन 1 जूनपासून उठवला जाईल की पुन्हा वाढवला जाईल यावर सर्व स्तरांत चर्चा सुरु आहे. बहुतांश नागरिक लाॅकडाऊन उठवण्याच्या बाजूने आहेत. तसेच व्यापारी संघटना देखील 1 जूननंतर लाॅकडाऊनच्या विरोधात आहेत. अशातच आता यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे.
‘1 जूननंतर लगेचच सर्वकाही उघडेल असे नाही. लाॅकडाऊन हळूहळूच उघडावा लागेल. राज्यात करोना संसर्गाची स्थिती नेमकी कशी आहे, हे पाहून निर्णय घेण्यात येईल. लोकांचे प्राण महत्वाचे आहेत. मागच्या वेळी लाॅकडाऊन हटवल्यानंतर करोना बाधित रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली. सध्या राज्यातील करोनाबाधितांची संख्या नक्कीच कमी होत आहे, मात्र लगेचच सर्व सुरु होणार नाही,’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
चिंता करू नका, गर्दी करू नका –
आपल्याला जसजसा लसीचा पुरवठा होत आहे, त्याप्रमाणे लसीकरण सुरु आहे. मुंबईतील परिस्थिती देखील नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. सध्या मुंबईत अजूनही 1300 ते 1400 रुग्ण आहेत. ही रुग्णसंख्या पूर्णपणे कशी कमी होईल याबाबत प्रयत्न सुरु आहेत, असे सांगत चिंता करून नका, गर्दी करू नका, असे आदित्य ठाकरे म्हणाले.