मुंबई – वाढता करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारकडून 14 एप्रिलपासून 1 मे पर्यंत संचारबंदीसह इतरही अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांमध्ये अजून वाढ करण्यात आली आहे. नवीन नियमावलीनुसार, किराणा, भाजीपाला, फळे अशा सेवा आता सकाळी 7 ते 11 वाजपेर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (20 एप्रिल) रात्री 8 वाजतापासून हे नियम लागू होणार आहेत. राज्य सरकारकडून नवीन निर्बंधांबाबत आदेश काढून त्यामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
काय आहेत नवे निर्बंध –
1) सर्व किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व प्रकरची अन्नपदार्थांची दुकाने, मांस-मच्छी-मटण विक्रेते, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने, प्राण्यांचे अन्नपदार्थ विकणारी दुकाने, पावसाळी साहित्य (छत्री, रेनकोट, ताडपत्री इ.) विकणारी दुकाने यांना सकाळी 7 ते 11 या वेळेतच परवानगी देण्यात आली आहे.
2) दरम्यान, वरील सर्व दुकानांमधून होम डिलीव्हरी मात्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुरूप बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
3) स्थानिक आपत्ती निवारण व्यवस्थापनाला कोणत्याही सेवेचा किंवा सुविधेचा समावेश अत्यावश्यक सेवा किंवा सुविधेमध्ये करायचा असल्यास त्यासाठी राज्य आपत्ती निवारण व्यवस्थापनाची परवानगी घेणं बंधनकारक असेल.
4) वर उल्लेख केलेल्या नव्या बदलांशिवाय इतर सर्व निर्बंध हे 13 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांनुसारच असतील.
🚨🚨
Some new additions to the guidelines. Please do read and share.#BreakTheChain pic.twitter.com/OUJt8MXOpp— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 20, 2021
दरम्यान, किराणा दुकानामुळे गर्दी वाढून संसर्ग वाढत असल्यामुळे सोमवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली होती. त्यात त्यांनी किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच खुली असावीत असा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता किराणा दुकानाबरोबरच फळे, भाजीपाला, अन्नपदार्थ विक्री, शेती उत्पादने या सेवांबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन नियामांवर भाजपची टीका –
राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या या नवीन नियमांवर भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे. “सरकारचा नियोजनशून्य कारभार सुरू आहे. 4 तासांचे निर्बंध घातल्यामुळे आता फक्त त्या ४ तासांमध्येच गर्दी होईल. त्या गर्दीचं काही नियोजन सरकारने केलं आहे का?”, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला आहे.