मुंबई – करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील प्रतिबंधित क्षेत्रात लागू असलेले निर्बंध आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आले आहेत. यासंदर्भातला आदेश ठाकरे सरकारने आज काढला. राज्यातील करोना प्रतिबंधित क्षेत्रात हे निर्बंध असणार आहेत. करोना विषाणूच्या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
दिवाळीनंतर करोनाचा संसर्ग वाढतो आहे असे लक्षात आले आहे. मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून करोना संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधित क्षेत्रात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाउन लागू करायचा असेल तर त्यासाठी आता केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. यासंदर्भातली सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारीच दिली होती. केंद्राकडून नव्या मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार आता प्रतिबंधित क्षेत्रे वगळता इतर भागांमध्ये निर्बंध लागू करण्यासाठी राज्यांना केंद्राची संमती घेणे आवश्यक आहे. करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच संमती द्यावी असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.