सर्व शैक्षणिक संस्थांना शिक्षणमंत्र्यांचे आदेश
पुणे – लॉकडाऊन काळात शाळांमधील विद्यार्थ्यांकडे फी मागू नये, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा, संस्थांना पुन्हा दिल्या आहेत.
लॉकडाऊन सुरू असतानाही शाळांमधील विद्यार्थ्यांची फी वसूल करण्यासाठी शाळांनी आपला तगादा सुरूच ठेवला असून पालकांना फोन केले जात आहेत. एसएमएसही पाठविण्यात येत आहेत. यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शाळांनी फी मागू नये. त्याबाबत तक्रारी आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा शालेय शिक्षण विभागाने आधीच दिला होता.
त्याबाबतचे पत्रही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले होते. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना शासन आदेशाचे पालन करण्याबाबतच्या सूचनाही दिल्या आहेत. मात्र, तरीही काही शाळांकडून फी वसुलीसाठीचे प्रयत्न सुरुच ठेवण्यात आल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
काही विद्यार्थी, पालक यांनी फी वसूलीच्या विरोधात थेट सोशल मीडियाद्वारे व फोन करुन शालेय शिक्षणमंत्र्याकडेच तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. त्याची शिक्षणमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, पालकांकडील पैशांची उपलब्धता याचा विचार करता सद्यस्थितीत फी मागू नये. शासनाच्या परिपत्रकाची शाळांनी अंमलबजावणी करावी, अशा सूचना शिक्षणमंत्र्यांनी शाळांना दिल्या आहेत. फी मागितल्यास विद्यार्थी, पालकांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन कार्यवाही करावी, असे आदेशही पुन्हा बजावण्यात आले आहेत.