नवी दिल्ली – दिल्लीत करोना संसर्गाची टक्केवारी घटल्यामुळे लॉकडाउन कायम राहणार की हटविला जाणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, उपराज्यपाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने संसदेच्या मागच्या अधिवेशनात दिल्लीचे उपराज्यपाल यांना जादा अधिकार देणारे विधेयक पारित केले होते. याचा प्रभाव आता जाणवू लागला आहे. दिल्लीत लॉकडाउन कायम ठेवायचे की हटवायचे याचा निर्णय उपराज्यपाल यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असे सावधगिरीचे उत्तर अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले.
मुळात, दिल्लीत करोनाचा संसर्ग झपाट्याने कमी होत आहे. पॉझिटिव्ह रेट हा पाच टक्क्यांपेक्षाही खाली आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ही टक्केवारी सुरक्षित असल्याचे चिन्हे आहे. अशात, लॉकडाउनचा कालावधी वाढविला जाईल की संपुष्टात येईल? असा प्रश्न पत्रकारांनी केजरीवाल यांना विचारला.
यावर केजरीवाल म्हणाले, शनिवारी-रविवारी उपराज्यपाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर जो काही निर्णय घेतला जाईल तो सांगितला जाईल. गेल्या 24 तासात दिल्लीत 3009 बाधित आढळून आले आहेत. तसेच 252 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 एप्रिलपासूनचा हा आकडा सर्वात कमी आहे. ऍक्टिव्ह प्रकरणे सुध्दा 36 हजारांच्या खाली आले आहेत. 11 एप्रिलनंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे.
दिल्लीत काळ्या बुरशीचे वाढते प्रकरण लक्षात घेता केजरीवाल यांनी हॉस्पिटल आणि डॉक्टरांना स्टेरॉईडचा वापर कमीत कमी करण्याचे आवाहन केले आहे. रूग्णांना सुध्दा स्वत:ची काळजी घेण्यास सांगितले आहे. स्टेरॉईड आणि शुगरच्या मिश्रणामुळे काळी बुरशीचे प्रकरण वाढते आहे. याबाबत लोकांना जागरूक करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी डॉक्टरांची इंटर डिसिप्लिनरी समिती बनविली जाणार आहे. याशिवाय एलएनजेपी, जीटीबी आणि राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये काळ्या बुरशीवर उपचार केले जाईल, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.