उंब्रज – “स्माइल प्लीज’ म्हणत सदैव दुसऱ्याला हसायला लावणारे छायाचित्रकार (फोटोग्राफर) लॉकडाऊनमुळे रडकुंडीला आले असून येणारे दिवस कसे काढायचे, या विचाराने धास्तावला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. त्याच्या परिणामांची तीव्रता सुरवातीला जाणवली नाही; पण आता ती जाणवू लागली आहे. साखरपुडा, लग्न, बारशी, वाढदिवस व इतर अनेक कार्यक्रम रद्द झाल्याने फोटोग्रार्फसना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. हे कार्यक्रम कधी सुरू होतील, हे सांगणे कठीण असल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे.
मार्च ते मे या तीन महिन्यांत शहरी, निमशहरी व ग्रामीण भागात धार्मिक, सार्वजनिक व खाजगी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. या तीन महिन्यांत लग्नाचे असंख्य मुहूर्त असतात. त्यामधील अनमोल क्षण फोटो, व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून टिपून संग्रही ठेवण्यासाठी सर्व जण इच्छुक असतात. त्यामुळे फोटोग्राफर्सना या दिवसात प्रचंड मागणी असते. मात्र, करोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रापंचिक व आर्थिक गणित बिघडले आहे. कुटुंबाचे पालन पोषण, साहित्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड, मुलांचे शिक्षण या गोष्टी मुश्कील होणार आहे. या व्यवसायावरील आर्थिक संकटाचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी दिलासा द्यावा, अशी मागणी फोटोग्राफर्स करत आहेत.