मुंबई – राज्यात लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या असताना भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या ट्वीटरवरून एक व्हिडीओ पोस्ट करत सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. त्यात त्यांनी सरकारला वस्तुस्थितीचा जाणीव करून देताना विरोधक म्हणून आपला कार्यभागही साधला आहे.केवळ लॉकडाऊन केले म्हणजे आपले काम झाले असे न मानता सरकारला आता त्याच्या पुढचे कामही करावे लागेल असे सांगताना सरकारला काही जबाबदाऱ्या देखील घ्याव्या लागतील,असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
राज्यात सध्या संपूर्ण लॉकडाऊन लागू न करता काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गेल्या महिन्याभरात राज्यातली रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार की आहेत तेच निर्बंध अधिक कठोर केले जाणार? यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला सवाल केले आहेत.
लॉकडाऊनचा निर्णय तर्कावर आधारीत होईल. पण लॉकडाऊन करताना काही पथ्य ठेवावी लागतील. काही नियोजन करावे लागेल. सरकारला काही जबाबदारी घ्यावी लागेल. फक्त लॉकडाऊन केलं, की आपलं कार्य संपलं असा विचार सरकारने करू नये. विजेच्या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल, सर्वसामान्यांच्या संदर्भात पॅकेजचा निर्णय घेतला जाईल का? छोट्या उद्योगांचं काय होईल ?
महिन्याला इएमआय भरणाऱ्यांसाठी राज्य सरकार काही करणार आहे का? छोटे दुकानदार, फुटपाथवरील फेरीवाले, छोटे व्यापारी, छोट्या उद्येजकांच्या बाबतीत सरकारची काय भूमिका आहे? नगरपरिषद, महानगरपालिका यांच्या मार्केट-कॉम्प्लेक्समधल्या दुकानदारांना आपण दुकानं बंद करायला लावतो आहोत. त्यांच्या भाड्याच्या पैशांचं आपण काही करणार आहोत का? अशा अनेक मुद्द्यांवर सरकारने चर्चा करायला हवी असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.